बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता आमीर खान, दिग्दर्शक रोहित शेट्टी, तसेच ज्येष्ठ अभिनेत्री फरिदा जलाल यांचा १४ मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय..............
आमीर खान
१४ मार्च १९६५ रोजी आमीर खानचा जन्म झाला. आमीरचे पूर्ण नाव मोहम्मद आमीर हुसैन खान. आमीरचा जन्म मुंबई येथे ताहिर हुसैन व झीनथ हुसैन या चित्रपट निर्मात्याच्या घरात झाला. आमीर चार भावंडांत सर्वांत मोठा. त्याला एक भाऊ (अभिनेता फैजल खान) आणि दोन बहिणी (फरहात आणि निखात खान) आहे. पुतण्या इम्रान खान हाही हिंदी अभिनेता आहे.
गेली अनेक वर्षे बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेला आमीर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रतिभावान व लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो. १९७३मध्ये ‘यादों की बारात’ या सुपरहिट चित्रपटातून चिमुकल्या आमीर खानने बॉलीवूड एंट्री केली होती. पुढील वर्षी, त्याने वडिलांची निर्मिती असलेल्या मदहोश चित्रपटात महेंद्रसिंग संधूची भूमिका निभावली. १९८४ सालच्या होली ह्या चित्रपटामध्येदेखील त्याची भूमिका होती.
कयामत से कयामत तक ह्या १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधून आमीरने जूही चावलासोबत नायकाच्या रूपाने सिनेसृष्टीत पदार्पण केले. ह्या चित्रपटाच्या यशानंतर आमीरने अनेक दर्जेदार भूमिका केल्या आणि त्याचे नाव बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये गणले जाऊ लागले.
आपल्या प्रेमिकेवर होणाऱ्या बलात्काराचा सूड घेण्याच्या इच्छेने गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे खेचला जाणारा आमीर खान ‘राख’ या क्राइम थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आला होता. ‘रंग दे बसंती’ मधून आमीरने सामाजिक आणि ऐतिहासिक विषयाला हात घातला होता अभिनयासोबतच आमीरने चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मितीदेखील केली आहे.
२०१२ सालच्या सत्यमेव जयते ह्या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा यजमान ह्या नात्याने त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. सत्यमेव जयतेच्या माध्यमातून वॉटर कपसारखी स्पर्धा घेऊन पाणीचळवळ राबवली जात आहे. आजवर आमीरला अनेक फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार मिळाले असून, त्याच्या कला क्षेत्रामधील योगदानासाठी भारत सरकारने त्याला २००३ साली पद्मश्री, तर २०१० साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.
२०११ साली आमीरला युनिसेफने जगातील शिशू आहार सुधारण्याच्या अभियानामध्ये राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्त केले. चित्रपटसृष्टीसोबत आमीरने इतर सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये योगदान दिले आहे. २००६ साली त्याने मेधा पाटकर चालवत असलेल्या नर्मदा बचाव आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. आपल्या अनेक वर्षांच्या करिअरमध्ये आमीरने अनेक सिनेमांसाठी लूक बदलले. ‘दंगल’ या अलीकडच्या सिनेमात आमीर कुस्तीवीर महावीरसिंह फोगट यांच्या भूमिकेत दिसला आहे. या सिनेमासाठी त्याने वजन वाढवून ९० किलो केले होते.
आमीर खान आणि किरण राव २००५मध्ये विवाहबंधनात अडकले होते. आमीर आणि किरण यांची भेट ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. आशुतोष गोवारीकर यांनी निर्मिती केलेल्या ‘लगान’ मध्ये किरण राव असिस्टंट डायरेक्टर होत्या. लग्नानंतर किरण राव यांनी ‘धोबी घाट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. आझाद असे या दोघांच्या मुलाचे नाव आहे. किरण राव ही आमीरची दुसरी पत्नी आहे.
रीना दत्ता ही आमीरची पहिली पत्नी. २००२मध्ये आमीर आणि रीना यांचा घटस्फोट झाला होता.
.........
रोहित शेट्टी १४ मार्च १९७४ रोजी रोहित शेट्टीचा जन्म झाला. तो या चित्रपटसृष्टीत आला, तेव्हा एकेकाळचा फाइट मास्टर शेट्टी यांचा मुलगा एवढीच त्याची ओळख होती. तशी त्याने लहानपणापासून ही इंडस्ट्री जवळून पाहिली होती. त्यातल्या प्रत्येक घटकाचा अभ्यास केला होता. जेव्हा त्याला इथे दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा त्याने आपला सारा अभ्यास इथे रिता केला. हा हा म्हणता तो या सिनेमासृष्टीचं एक चलनी नाणं झाला. या चित्रपटसृष्टीला पहिल्यांदा शंभर कोटीच्या व्यवसायाची चव चाखून देणारा रोहित शेट्टी आज चारशे कोटींच्या क्लबमध्ये गेला आहे. त्याने ‘खतरों के खिलाडी’ या धोकादायक स्टंट असलेल्या रिअॅलिटी शेमधून आपली छोट्या पडद्यावरची इनिंग सुरू केली आहे.
रोहित शेट्टीचा चित्रपट म्हटलं की हसून लोटपोट व्हायला लावेल अशी कॉमेडी आणि अॅशक्शन सीन्सचा भडिमार या गोष्टी डोळ्यांसमोर येतात. गोलमाल सीरिज, सिंघम यांसारखे त्याचे चित्रपट याचे उदाहरण आहेत.
.......
फरिदा जलाल १४ मार्च १९४९ रोजी नवी दिल्लीत फरिदा जलाल यांचा जन्म झाला. फरिदा जलाल यांची गणती अशा अभिनेत्रींमध्ये होते, की ज्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांत काम केले; मात्र मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांना एकही सिनेमा मिळाला नाही. त्यांनी ‘आराधना’, ‘नया रास्ता’, ‘गोपी’, ‘तकदीर’, ‘मजबूर’, ‘पारस’, ‘अमर प्रेम’, ‘बॉबी’, ‘लोफर’, ‘हिना’, ‘याराना’सह बऱ्याच सिनेमांत त्या झळकल्या आहेत.
आजपर्यंत त्यांनी दोनशेपेक्षाही जास्त हिंदी चित्रपटात काम केले आहे. तसेच, त्यांनी तेलुगू, तमीळ, इंग्रजी चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे. ‘शरारत’ या मालिकेत त्यांनी जियाच्या आजीची भूमिका साकारली होती. याच भूमिकेसाठी त्या खासकरून ओळखल्या जातात. ‘पारस’ (१९७१), ‘हिना’ (१९९१), ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेगे’ (१९९५) या चित्रपटांतील भूमिकेकरिता त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
माहिती संकलन : संजीव वेलणकर